Sunday, September 26, 2010

फॉल पडला!



   पाश्चिमात्य देशात वर्षाची साधारणपणे चार ऋतुंमध्ये विभागणी केलेली असते: वसंत (स्प्रिंग), उन्हाळा (समर), शरद (फॉल/ऑटम) आणि हिवाळा (विंटर). पण कोणी काही म्हणू द्या कॅनडामध्ये  केवळ दोनच ऋतू आहेत असा आमचा दृढ समज आहे. एक हिवाळा आणि दुसरा बर्फाळा! पैकी बर्फाळा हा वर्षातले ६ महिने (ऑक्टोबर ते मार्च) असतो आणि मी ज्याला हिवाळा म्हणतो त्या ऋतूत इथल्या लोकांनी बाकीचे ऋतू कोंबुन ठेवलेले आहेत. परन्तु एका भारतीयानं २५ अंश सेल्सिअस प्रसन्न तापमानाला उन्हाळा म्हणणं म्हणजे त्याच्या भारतीयत्वाशी प्रतारणाच की! पण कितीही संक्षिप्त तरी सर्व ऋतू आपापली पदाचिन्हे सोडून जातातच हे नक्की.

    पैकी वसंत आणि शरद हे रंगेबिरंगी ऋतू आहेत.  वसंतात झाडांवर विविध रगांची फुले उमलतात तर शरदात झाडांची पाने आपला रंग बदलतात आणि अख्खा भूमि लाल-हिरव्या-सोनेरी रंगाचे भरजरी वस्त्र ल्यालासारखी दिसते.  असा हा रंगेबिरंगी फॉल सध्या आमच्याकडे पडलाय. (म्हणजे ऊन पडणे, थंडी पडणे, पाऊस पडणे अश्या अर्थानं!). मी ज्या ठिकाणी पक्षीनिरीक्षणाला जातो ती जागा एकदम भन्नाट आहे. शहरापासुन दूर, नदीकिनारी थोड्याश्या उंचीवर वसलेल्या ह्या जागेवरुन खुप दूरवरचा परिसर पहायला मिळतो. त्यातून ही "नॉर्थ-सास्कॅचवन" नदी एक विलोभनीय वळण घेत 'चंद्रभागा' होते! वळणदार नदी, बाजुला गर्द झाडी, समोर मैलोन्-मैल सपाट प्रदेश आणि क्षितिजावर एडमंटन शहराच्या गगनचुंबी इमारती ह्या सगळ्यामुळे लँडस्केप (छाया)चित्रकारीतेसाठी ही एक आदर्श जागा बनुन जाते! त्यातून शरदाची रंगपंचमी चालू असेल तर काय विचारा!

वळणदार नदी आणि आजुबाजुला 'पडलेला' फॉल!

 ह्या झाडांची पण गम्मत असते. काही झाडांची पाने पिवळी होतात तर काहींची लाल. काही पांढरी पडतात तर काही रंग बदलण्याच्या भानगडीतच पडत नाहीत! परीणामतः विविधरंगी झुबक्यांनी सगळ परिसर नटुन जातो.

कधिकधी वाटुन जातो अरे हे सगळं कशासाठी चाललंय? (ईश्वरानं समस्त सृष्टी मनुष्याच्या उपभोगासाठी आणि मनोरंजनासाठी बनविलेली आहे, अश्या 'इंटेलिजेंट डिझाईन'च्या मतप्रवाहाशी मी आजिबात सहमत नाही!) ह्या सगळ्यामागचं विज्ञानही फार भन्नाट आहे.


सगळ्याची सुरवात होते, ते पानांमधल्या क्लोरोफीलपासून! झाडं सतत क्लोरोफील तयार करत असतात, जे पानांमध्ये साचले जाते. क्लोरोफील सूर्यप्रकाशाचे रुपांतर झाडांना आवश्यक त्या उर्जेमध्ये करते (प्रकाश संश्लेषण). ह्या क्लोरोफीलमुळेच पानांना हिरवा रंग येतो. जसाजसा हिवाळा जवळ येउ लागतो तशीतशी सूर्यप्रकाशाची तिव्रता आणि काळ कमी होऊ लागतो. मग झाडांची उर्जेचे रुपांतर करण्याची प्रक्रियाही मंदावते. पण पानांमधुन बाष्पीभवनाच्या प्रक्रियेतुन खुप सा-या पाण्याचा अपव्यय होउ लागतो! मग अश्यावेळी काही झाडं, ज्यांना पानगळी/पानझडीची झाडे म्हणतात, ती सरळपणे आपली पानेच झडून टाकायची प्रक्रीया सुरू करतात! त्याच्याच एक भाग म्हणुन ही झाडं क्लोरोफील बनवणे थांबवतात. जसेजसे पानांमधिल क्लोरोफील संपू लागते तसे तसे त्यातील इतर घटक (पिगमेंट्स) दृष्टीस पडू लागतात, मग ज्या पानांत जे घटक आहेत त्या नुसार त्यांना पिवळा, लाल, राखाडी असे विविध रंग प्राप्त होतात! बाकी काही झाडे (सूचीपर्णी) असे रंग बदलण्याच्या कटकटी करण्यापेक्षा जरा जाडसर पाने निर्माण करतात आणि बाष्पीभवनापासून स्वतःला वाचवतात. ती सदैव हिरवीच राहतात.


पण ह्या रंगबिरंगी ऋतूलासुद्धा जराशी उदासिनतेची झालर आहे. क्षितिजाच्या पार आता हाडं गोठवणारी थंडी वाट बघत आहे, आता सृष्टी उजळून टाकणारा सूर्यप्रकाश आता अभावानेच येणार, आता पक्षी दूरदेशी निघुन जाणार अश्या विचारांनी कविमनं हळवी होतात. आटणारा सूर्यप्रकाश मन खच्ची करुन जातो. (हो, तुम्हाला माहितीय का की, सूर्यप्रकाश सर्वात प्रभावी 'अँटी-डीप्रेसंट' मानला जातो!) त्यामुळे अश्या ऋतूंमध्ये कविलोकांनी विरहाची भाषा केली नाही तर नवलच.


Who now has no house, will not build one (anymore).
Who now is alone, will remain so for long,
Will wake, and read, and write long letters 
And back and forth on the boulevards 
Will restlessly wander, while the leaves blow 
            - Herbsttag (Autumn Day)  by Rainer Maria Rilke. (विकीवरुन साभार)

सूर्यप्रकाशात उजळून गेलेल्या इमारती अन् आभाळात साचलेलं मळभ!

Monday, September 6, 2010

पास्ता!

  आज मी चक्क एका पाककृतीबद्दल लिहिणार आहे! एकटं राहिलं की, स्वतःच स्वयंपाक बनवून खावं लागतं त्यामुळे स्वाभाविकच स्वयंपाकघरात जाणं होतं! पण समस्या अशी आहे की, संतमंडळींन्नी म्हटल्याप्रमाणे "आळस हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे" (आणि "गरज ही शोधाची जननी असेल, तर आळस हा त्याच्या बाप आहे!"), त्यामुळे कधितरी, नेहमी, वारंवार, रोजच्या रोज तुम्हाला स्वयंपाकाचा आळस येणे हे स्वाभाविकच आहे!  त्यातुन बहुतांश भारतीय पदार्थ हे 'साग्र-संगित' प्रजातीत मोडतात आणि भारतीय जेवण बनवणं हे कमालीचं जिकरीचं बनुन जातं. मग एका बाजुला आळस आणि एका बाजुला भुक, अश्या दारूण प्रसंगी युरोपातले पदार्थ मदतीला धावून येतात! ईटालीचा पास्ता हा त्यापैकीच एक!
पास्त्याचे प्रकार! (विकीपिडीया वरुन साभार.)

  पास्ता हा ईटालियन जेवणाचा अनिवार्य भाग आहे. पण पास्ता हे कोणत्या एका पदार्थाला उद्देशुन नाव नाही. पास्त्याचे अक्षरशः हजारो प्रकार आहेत आणि ते अस्मितेसमान ईटालियन मातीत जपले जातात! साधारणपणे कणिक किंवा मैदा तिंबुन जे काही बनवता येईल त्याला ढोबळमानाने पास्ता नाव देतात. मग त्या कणकेपासुन जर शेवया बनवल्या तर त्यांना "स्फगेटी" म्हणायचं, नळ्या बनवल्या तर "मॅकरोनी" म्हणायचं, मोठे चौकोन लाटले तर "लझानिया" म्हणायचं आणि स्प्रिंगा बनवल्या तर "फ्युसिली" म्हणायचं. अर्थात त्यांचे आकार-लांबी-रुंदी ह्या वरुन पुढे त्यांची हजारो नावे तयार होतात.

  पास्त्याच्या अनेक सोप्या पाककृती आहेत पण मी जी पाककृती सांगणार आहे, ती झटपट होणारी नाही पण कमी परिश्रमाची आहे (आळस!). तर पास्ता बनवण्याची सुरवात होते, पास्ता खरेदी करण्यापासुन. बाजारात जाउन तुम्हाला आवडेल त्या आकाराचा पास्त आणावा (मी बहुदा स्प्रिंग किंवा शिंपल्याचा आकाराचा पास्ता आणतो). ह्या व्यतरिक्त तुम्हाला काही खास ईटालियन पदार्थ पण लागतात: थोडे ऑलिव्ह तेल, पार्सेली, टोमॅटोची पेस्ट, चीज (ह्या पदार्थांना शेंगदाणातेल, कोथिंबीर, केचअप आणि पनीर हे पर्याय होउ शकत नाहीत हे वाचकांनी ध्यानात घ्यावे!), कांदा आणि लसुण. हे पदार्थ तसे मॉल्समध्ये सहज सापडतात!

 प्रथम एक मोठा बाउलभर पास्ता शिजवात ठेवावा (मला वस्तूंची मापं ग्रॅम-मिलीमध्ये सांगणं जरा विचित्र वाटतं). त्यासाठी पास्ताचं पाकीट पहावं. प्रत्येक पास्त्याची शिजवण्याची वेळ ठरलेली असते आणि ती त्या पाकिटावर नोंदवलेली असते. उकळत्या पाण्यात साधारण १०-१५ मिनिट पास्ता शिजत ठेवावा लागतो. कमी वेळ शिजला तर पास्ता चांगला लागत नाही आणि जास्त वेळ शिजला तर लगदा होतो. पास्ता शिजत असताना बाजुला थोडी पार्सेली, १ कांदा आणि २/३ लसुण एकदम बारीक चिरुन ठेवावेत. पास्ता शिजुन झाला की, ऑलिव्ह ऑईल तापवत ठेवावे. ऑलिव्ह ऑईल  तापल्यावर (किंवा बराच वेळ झालात असे वाटल्यावर) त्यात पार्सेली परतुन घ्यावी, मग लसुण परतावा मग कांदा परतावा. कांद्याने रंग बदलला की परतुन परतुन कंटाळा आला की त्यात टोमॅटोची पेस्ट घालावी. टोमॅटो पेस्ट जरा सढळ हातानेच घालावी लागते. साधारण एक मोठी वाटी. २-३ मिनिटं परतावे!  (ही परतण्याची प्रक्रिया चालू असताना शेफाने/शेफीने स्वतःच्या भारतीय प्रकृतीला काबूत ठेवावे. ह्या सर्व प्रकारात, जिरे, मोहरी, मेथ्या, कसुरी मेथी, उडीद डाळ, हळद, गोडा, गरम किंवा गार मसाला, तिखट ई. ई. काहीही घालण्यापासुन स्वतःला परावृत्त करावे आणि पास्त्याचे ईटालियनत्व अबाधित ठेवावे). आता ह्या मिश्रणात शिजवलेला पास्ता (पाणी काढून) टाकून नीट ठवळावा, त्यात चवीनुसार मीठ टाकून थोड्यावेळ झाकून ठेवावं. मग त्यावर थोडे (खरे सांगायचे तर भरपुर) चिज टाकून तापू द्यावे, चिज वितळून सर्वत्र पसरल्यावर गॅस बंद करावा! झाला पास्ता तयार!

 पास्त्याला चव ऑलिव्ह ऑईल मध्ये तळलेल्या पार्सेली-कांद्या-लसणामुळे येते आणि अर्थातच चिज तर महत्त्वाचे! वाचकाच्या ध्यानात आलेच असेल की, ह्यात तिखटजन्य पदार्थांची उणिव आहे. जर तुम्हाला जर थोडा मसाला हवाच असेल तर बाजारात जरा तिखटाकडे झुकणारे "ईटालियन-ड्रेसिंग" मिळते त्याचा वापर करु शकता. (अर्थात भारतीय मसाले वापरुन केलेला "पंजाबी-पास्ता" अनेक हॉटेलांत मिळतोच की!)

आणि हो, एक सांगायचे राहिलेच! इतके सगळे झाल्यावर शेफाला/शेफीला आपला पास्ता आवडेलच ह्याची कोणतीही शाश्वती लेखक देउ शकत नाही. वाचकांनी विवेक जागृत ठेवावा. :)